Thursday, July 24, 2008

Asach kahitari..


मी तसं फार सुंदर असं स्वप्न कधी पाहतच नाही.. खरंच.. मला पडणारं फार चांगलं असं पेटेंट स्वप्न म्हणजे.. मस्त पहाट आहे धुक्यातून वाट शोधत सूर्याची तिरपी किरणे डोकावत आहेत.. थंड पण हवं हवस वाटणार वारं सुटलं आहे.. मी मस्त अंथरुणात लोळत आहे.. घट्ट मिठीतअ उम्म् ..(for sake of sanskars) सध्या उशी आहे असं समजा.. ती हळूच मिठी सैल करत कूस बदलते.. मी तीला आणखी जवळ घेतो.. ..आणि.. आणि एकदम mobile चा अलार्म वाजतो.. माझ्या सुखी स्वप्नाचा शेवट असा दु:खद वास्तववादी होतो नेहमी.. अशा वेळी mobile मध्ये गजराची सोय करण्याची अक्कल लढवणारा जर सापडला तर.. तर तोच mobile त्याला फेकून मारला असता..उठन्याची तसदी न घेता दूसरा वार करणे शक्य नाही म्हणुन नाहीतरअसा रंगाचा भंग करणारा mobile म्हणजे शत्रु वाटू लागतो मला.. आत्ता कळलं मला पहाटे आत्महत्या करणार्यांची संख्या जास्त का आहे ते...

एक तर माझ्या स्वप्नाची वेळ चुकत असावी किंवा या गजराची.. स्वप्नाला दोष देण्यात अर्थही नाही हो.. ते काय कधीही पडायचं..पण mobile च काय.. आजपर्यंत एकदाही माझं हे स्वप्न पुर्णत्वाला जाऊ दिलं नाही..ऐन वेळी ती अलार्म ची नीरस धुन चालू होते.. आजपर्यंत मला दोन धून अजिबात आवडल्या नाहीत.. एक ती खेळन्यातल्या mobile वाली छैया छैया. आणि दूसरी म्हणजे माझ्या alarm ची धून.. कुठे वाजायाला लागली की मी जन्मजात बहिरा का जन्मलो नाही असं वाटायला लागत.

गजरावरुन आठवलं..माझ्या एका मावसभावाला घड्याळाचा गजरच ऐकू येत नाही.. शेजारचं घड्याळ मस्त उशीखाली घेवून तसाच वाजवत ठेवतो तो.. गजर म्हणजे जणू काही अंगाईच्या सुरुवातीचा आलाप वाटतो त्याला..आणि अशा या निद्राप्रेमीवर परिस्थितिने अशी काही वेळ आणली, की त्याला नोकरीसाठी पहाटे सहाची लोकल पकडावी लागायची. पहिले काहि दिवस ठरल्याप्रमाणं त्याला टॅक्सीचा खर्च सोसावा लागला. शेवटी त्याने वेगवेगळ्या आवाजात वाजणारी चार घड्याळं विकत घेतली. रोज रात्री तो चार घड्याळे पाच पाच मिनीटांच्या अंतराने गजर लावून वेगवेगळ्या, सहजासहजी हाती लागणार नाहीत अश्या ठिकाणी ठेवायचा.. एक टेबलावर.. एक कपाटावर.. एक कॉटखाली.. आणि एक टेबलाचा ड्रॉवर अर्धवट उघडुन त्यात.. अशी व्यवस्थित व्युहरचना करुन झोपायचा. रोज पहाटे ती घड्याळे रनशिंग फुंकल्यासारखी एकापाठोपाठ वाजायाची आणि हा प्रत्येकाचा समाचार घेण्यासाठी इकडुन तिकडे पळायचा. या सगळ्या धावपळीत तो झोपेतुन कधी उठायचा त्याचे त्यालाच कळायचे नाही.

हे प्रकरण देखील काही दिवस यशस्वी चालले.. नंतर या गोष्टीची देखील त्याला इतकी सवय झाली की एक गजर वाजला की तो अर्धवट झोपेतच ओळीने एक एका घड्याळाची बटणे सफ़ाईने बंद करायचा आणि उशीखाली डोके लपवून पुन्हा आपल्या निद्राराधनेत मग्न व्हायचा.

माझा एक मित्रतर weekends ना देखील गजर लावुन झोपतो. दर सुट्टीच्या दिवशी त्याच्या गजराने आम्ही सगळे उठायचो आणि हा मात्र गजर बंद करुन आरामात पुन्हा झोपी जायचा. एकदा झालं.. दोनदा झालं.. नंतर वैतागून विचारलेच मी एकदा.. तर म्हणतो "मुद्दाम नेहमीच्या वेळचा गजर लावतो weekend ला. नेहमीसारखं उठुन अंथरुणात जेव्हा लक्षात येतं की आज सुट्टी आहे. आणि officeला जायचं नाही, तेव्हा भारी वाटतं. परत झोपी जाण्यात मस्त मजा येते.. तो आनंद मला miss करायचा नसतो".. आता यावर काय बोलणार?.. त्याच्या या साखरझोपेसाठी आमच्या सगळ्यांच्या झोपेत मीठाचा खडा टाकून हा मोकळा होतो नेहमी.

हॉस्टेलवर असताना, PL च्या काळात दररोज पहाटे सहाच्या दरम्यान कुणाचातरी गजर वाजायचा.. अगदी मोठया आवाजात.. बराच वेळ.. नक्कीच आमच्या लॉबीमध्ये पहाटे उठून अभ्यास करणारा कोणीतरी scholar होता. थोडा वेळ झाला की असह्य होउन खालच्या लॉबीतून एक सणसणीत शिवीवजा comment यायची. आणि तो वाजणारा गजर आपोआप बंद व्हायचा. हे अगदी परिक्षेपर्यंत नित्यनियमाने चालायचं. आमच्या सगळ्यांची इतकी दुषणं घेवुन तो असे कितीसे मार्क पाडणार होता काय माहित.. मला कधीही त्या रहस्यमय अभ्यासु मित्राचा शोध लागला नाही.. आणि इतक्या पहाटे उठुन त्याला शोधण्याची इच्छा पण झाली नाही.

घरी तर यापेक्षा वेगळी तऱ्हा... माझ्या आईला सकाळसकाळी रेडिओ ऐकायची.. खरं तर ऐकवण्याची सवय आहे. म्हणजे त्या तालावर ती अंघोळ, देवपूजा, झाडलोट, साफसफाई सगळी कामं करते. मला त्या रेडिओचा किनकिना आवाज सुरु झाला कि लगेच जाग येते. मग मी आईच्या पहिल्या चहात आणखी अऱ्धा कप वाढवायला सांगतो आणि सोफ़्यावर लोळायला जातो. तिकडे रेडिओचं सुरुच असतं. "आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे सहा वाजले आहेत. थोड्याच वेळात सुरु होतोय कार्यक्रम विचारमंथन..".. आणि मग कोणीतरी विचारवंत.. आरोग्य, ग्रंथ, आहार, व्यायाम असल्या अगम्य विषयांवर चर्चा सुरु करतात. मला हे कळत नाही.. सहा सकाळी नाहीत तर पहाटे लोकांच्या झोपेच्या वेळी वाजतात हे या बाईच्या लक्षात कसं येत नाही.. बरं असो.. इतक्या पहाटे इतक्या मोठ्या विचारवंतांना झोपेतून जागे करून असलं विचारांचं आदानप्रदान करण्याची शिक्षा का बरं देतात हे निर्दयी लोक? ते संपलं रे संपलं की मग कृ॒षी क्षेत्रावर काहीतरि कार्यक्रम सुरु होतो.. आता मला सांगा, शेतकरी पहाटे उठल्यावर पहिला धारा काढेल.. वैरनी आणायला जाईल.. का ह्याच्या युरिया आणि नायट्रोमोनोफॉस्फेटचं प्रमाण लिहुन घेत बसेल.. मी असल्या निरर्थक गोष्टी पहिल्या चहाबरोबर ऐकून दिवसाची सुरुवात करतो.

हे नाहि झालं तर शेजारी कोणीतरि गायत्रीमंत्र लावतं.. अनुराधा पौडवालनं दोन मिनिटात अर्थ न कळता, म्हणलेला तो मंत्र आम्ही repeat mode मध्ये पाउण तास ऐकतो. ते कमी कि काय म्हणुन उडपी काकूंना जोश येतो.. मग वेंकटेश आरतीची revision होते. (म्हणून त्यांच होटेल चालत नसावं बहुतेक. भल्या पहाटे असल्या काकडआरतीने जागं केल्यावर कुठला देव कल्य़ाण करेल सांगा. ) लोकांच्या धार्मिक भावनांवर मला काही आक्षेप नाही. उदबत्ती, गंध, कापुर, फुलं इथवर सगळं संपत असेल तर.. त्या अशा सकाळी उफ़ाळुन येतात याचा मला खरा राग आहे. माझ्या नास्तिक होण्यात अशा शेजार्याचा मोठा वाटा आहे.

या सगळ्या शहरी त्रासाने कंटाळून मी सुट्टीत गावी जातो.. तिकडची पहाट म्हणजे काय सांगता? मस्त नदीकीनारी गाव आहे आमचं.. भल्या पहाटे उठुन आजी पाणी तापवायला चूल पेटवते.. मस्त गोधडीत मी लोळत असतो. पण तिथंही माझी झोपमोड करायला एक शत्रु तैनात केला आहे परमेश्वराने.. गावाकडच्या घरी एक कोंबडा पाळला होता. जाडजूड.. मोठ्ठया लाल तुर्याचा हा अतिउत्साही प्राणी.. I mean पक्षी कौलांवर उंच जाउन बसायचा.. आणि कोणतीही काळ वेळ न पाहता मोठ्ठ्यानं आरवायचा.. अगदी कधीही.. पहाटे चार.. सकाळचे दहा.. दुपारी सगळे जेवुन जरा पहुडले कि.. कधीही.. म्हणजे हा नक्की कोणत्या Time Zone मध्ये जन्मलाय हे कोडं आहे मला.. का याची आई अंडं देताना jetlag मध्ये होती देव जाणे.. लोकांच्या नाकी नऊ आणले होते यानं. कोंबडं झाकलं तरी तांबडं फ़ुटायचं राहत नाही म्हणतात. इथं कोंबडं झाकलं नाही म्हणुन लोकांची रागानं तांबडं व्हायची वेळ आली होती. असल्या आमच्या या कम्युनिस्ट विचारांच्या कोंबड्याचं जवळपासच्या कोंबड्या सोड्ल्या तर गावात कुणाशीही पटलं नाही. शेजारी पाजारी तर वैतागले होते. शेवटी एके दिवशी व्हायलाच हवं होतं असं एक विपरीत झालं. एकाएकी तो कोंबडा गायब झाला. मला तो दिवस चांगला आठवतो. कधी नाही ते दुपारी भरपूर जेवुन मस्त झोपलो होतो दोन तास.. (शेजारच्या यादवांच्या घरातुन कोणीतरी चिकन रस्सा पाठवून दिला होता बहुतेक.. असो..)

माझी आणि मोठ्या विचारवंतांची बहुतेक मते जुळतात, पण या माझ्या हक्काच्या विषयावर मात्र जरा दुमत आहे. किंवा त्यांचे विचार चुकीच्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचवले गेले असावेत. पंडीत नेहरू पाचच तास झोपायचे म्हणतात. असतो एखाद्याला निद्रानाशाचा आजार. झोप लागत नाही तर करणार काय हो बिचारे सांगा मला. याच नेहरुंनी लिहिलेलं वाक्य "आळस हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रु आहे" मी शनिवारी सकाळी शाळेत कितीतरिदा फ़ळ्यावर लिहिलं आहे.. आळस देत..

मला तर वाटतं एखाद्या दिवशी कॉंग्रेसच्या एखाद्या बैठकीत नेत्यांची रात्रीपर्यंत बराच वेळ चर्चा चालली असावी. शेवटी काहिच ठराव होत नाही हे लक्षात आल्यावर आत्ता बराच उशीर झाल्याने तिथंच झोपायचा ठराव संमत झाला असावा. सगळे गाढ झोपले असावेत. गांधीजी पंचा अंथरुन थंडित कुडकुडत कोपर्यात एका कुशीवर झोपले आहेत. सरदार पटेल मस्त घोरत आहेत. जयप्रकाश नारायण, मौलाना आझाद आदी मंडळी आपापली कोपर्यात पहुडली आहेत. साहजिकच या सगळ्यांना इतकं निवांत झोपलेलं पाहुन नेहरुंना त्रागा होत असेल. आणि अशातच संयम सोडुन त्यांनी लिहिलंहि असेल असलं वाक्य. पण म्हणुन काय ते इतकं प्रसिद्ध करायचं. अगदी सुविचार होण्याइतपत.. मोठ्ठ्या लोकांच्या अशा छोट्या छोट्या गोष्टी प्रसिद्ध होतात. आणि मुल्यशिक्षणासारख्या विषयांचा syllabus वाढतो.

आजकाल कोण झोपेचा कर्दनकाळ बनून येयील सांगता येत नाहि. कोणी पहाटे मोठ्ठ्यानं विचित्र वाजणार्या reverse horn सह गाडी काढण्याची कसरत करतं. कचरा गोळा करायला गाडी काय येते. कोणी कुकरची शिट्टी काय वाजवतं.. काही सांगु नका. एक झाला कि एक षडरीपु: पाठोपाठ येतात. वैताग येवुन जातो. दोन सुंदर रात्रिंत एक कंटाळवाणा दिवस सुस्तावलाय असं वाटायला लागतं..

पण खरं सांगू.. सकाळी कुणीतरी उठवतं म्हणुन तर पुन्हा रात्रि अंथरुणात शिरायला मजा येते. मस्त दिवसभर आपण स्वप्नाच्या बटव्यात वास्तवाच्या वाळुत पसरलेले चमकदार, काही टोकेरी, वेडेवाकडे रंगीत शंख-शिंपले,खडे गोळा करत भटकतो. आणि रात्री त्या बटव्यातल्या एक एक वस्तु जमेल रुचेल तशा रचत बसतो. दुसर्या दिवशी पुन्हा निघतो शोधायला.. कधी कालचं राहिलेलं काहितरि पुर्ण करायला.. कधी नवीनच सुरुवात शोधायला.. शेवटी कधी तरी मग बटव्याची गाठ सुटतच नाही काही केल्या. गुंता होतो सगळा. कायमची अडकतात..शंख-शिंपलं.. स्वप्नं.. कितीही गजर झाला तरी मग जागच येत नाही.

अमित पवारamipawar21@gmail.com