परवा पुलंच मी मुंबईकर, पुणेकर आणि नागपुरकर ऐकत होतो.. राहुन राहुन मला माझ्या कॉलेजची आठवण झाली.. सांगलीच्या आमच्या वालचंद कॉलेजमध्ये असेच ढोबळमानाने वेगळे काढता येण्यासारखे तीन ग्रुप होते..
सांगलीकर, सातारकर आणि कोल्हापुरकर...
तुम्हाला सांगलीकर ग्रुप मध्ये जायचं आहे का? तर मनाची फ़ार तयारी करुन जा.. पदोपदी अपमान आणि चेष्टा सहन करण्याची ताकद जमवुन घ्या आणि जरुर हा ग्रुप जॉईन करा. कॉलेजमधली आठपासुनची सगळी लेक्चर्स ओळीने करण्याचा संयम बाळगुन रहा. कॉलेजला येवुन लेक्चर चुकवणं म्हणजे संकष्टीला गणपती मंदिरासमोर जावुन वडापाव खावुन उपवास मोडण्याइतकं पाप वाटतं या लोकांना.. आठच्या लेक्चरला जाउन मागे झोपा काढतील.. सरांच्या चुका काढतील.. तोंडावरची माशी कंटाळून उडुन जाईल असल्या पोरि बघत बसतील.. पण लेक्चर चुकवणं .. अंहं..
या ग्रुपमध्ये जायचं तर तुमचा स्वाभिमान प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळुन सॅकमध्ये ठेवुन टाका.. आणि मग चला.. कारण हे लोक एकमेकांना कशावरुन चिडवतील हे सांगता येत नाही.. रंग, रूप, जात, पात, धर्म, वर्ण, बुद्धी या कशाचीही तमा यांच्या ठायी नाही.. खरं तर असली तारतम्यरुपी बंधनं पाळणं हे यांच्या स्थायीभावातच नाही. म्हणजे यांच्या ग्रुप मध्ये खऱ्या नावाने कोणीही कोणाला बोलवत नाही.. इतर ठिकाणी फ़ार फ़ार तर नावाचा अपभ्रंश होतो मात्र इथं एकंदरीत व्यक्तीमत्वाचा अपभ्रंश करुन नावं ठेवतात.. ठेवतात म्हणजे काय अशी ठेवतात की लोकं नावं ठेवायलाही असली नावं वापरणार नाहीत.. या बाबतीत सांगली-मिरजकरांची प्रतिभा वाखानण्यासारखी आहे.. खरी नावं रगिस्टरमध्ये अडगळीत धुळ खात पडुन रहातात.. ती इतकी विस्मृतीत जातात की कुठंतरी proxy मारताना आपल्या झिंग्याचं खरं नाव काय रे? असा संभ्रम होतो कधी कधी.. आता हा झिंग्या म्हणजे कुठंतरी आपल्याच तंदरीत रमणारा एकटा एकटा राहणारा मुलगा आहे हे समजुन घ्यायचं.. दात पुढे असणाऱ्याला ’तारे जमिन पर’ म्हणतील. उंची कमी असणारा छोटा छ्त्री असतो.’धुमकेतु’ हे नाव तुमच्या मते एखाद्याला का पडलं असावं, तो कॉलेजमध्ये कधीतरी दिसतो म्हणुन.. हा ग्रुप लेक्चरर्सना देखिल यातुन मुक्ती देत नाही.. एखाद्या फ़ारच पुरुषी आवाज असणाऱ्या मॅडमना ’बजाज पल्सर’(definitely male), किंवा मुळातच हसरा चेहरा असणाऱ्या सरांना विक्टर (more smiles per hour) म्हणतील. अतिशय जाड असणाऱ्या मेकॅनिकल च्या सरांना बॉयलर म्हणत..
बॅटरी, चपण्या, ढापण्या, नकट्या ही असली मुळमुळीत नावे श्रीयुत किंवा माननीय अशी आदरार्थी धरावीत इथं.. हे लोक चिडवण्यात जंगिझ खान इतके निर्दयी आहेत. म्हणजे एखाद्या डावखुऱ्याला तू नेमकं कोणत्या हाताचा वापर कशासाठी करतोस इतकं विचारायलाही कमी करत नाहीत. एखाद्या रंगात मार खाणाऱ्या मुलाला तोंडावर काळ्या म्हणण्याचं आणि ते पचवण्याचं धैर्य इथंच पहायला मिळतं. पंढरीच्या विठ्ठलाला काळा म्हणावं इतकं सहजासहजी हे लोक त्याला काळ्या देसाई म्हणुन हाका मारतात.. आणि याचं त्यालाही काही वाटत नाही. पण हे त्याच्या रुखुमाई समोर झालं तर मात्र त्याचा चेहरा बघण्यासारखा होतो.. तुम्हीच कधीतरी दयेने उगीच तोंडावर नैतिकता आणुन “इतकाही सावळा नाहिस तु..” असं काहीतरी म्हणायला जाल आणि त्याच्या काळ्या कपाळावरच्या आठ्याही स्पष्ट पहाल..
सांगली-मिरजकर कॉलेजला मस्त दोन कप्पी डबा आणतात घरातुन.. झाडाखाली किंवा कॅंटीनमध्ये तो पुर्ण संपवतात आणि हॉस्टेलवर तुमच्या रुममध्ये येवुन विचारतात "या आठवड्यात घरी जाउन आलास ना.. घरुन काही खायला आणण्याची पद्धत?"
कॅंटीनमध्ये तुमच्या पैशाचा चहा ढोसतील आणि "छ्या.. कसला चहा पाजलास लेका.. तु मिरजेला ये एकदा चहा प्यायला.. असा चहा पाजतो, असा चहा पाजतो.. रोज येशील मिरजेला.." बोलवुन बोलवुन चहाला बोलवतात..दोन रुपयांचा चहा प्यायला आठ रुपयांच तिकीट काढुन कोणीही मिरजेला येण्याची यत्किंचितही शक्यता नाही हे आधीच माहीत असतं..
भाषावैशिष्ट्यांमध्ये सांगायचं तर सांगली मिरजेने मराठीला दिलेली एक बहुपयोगी देणगी म्हणजे मारणे.. मारणे हे हिंसावादी क्रियापद इथं कशाही बरोबर कशाही अर्थी वापरतात.. म्हणजे इथं मुलींना प्रपोज मारतात.. मारतात म्हणजे शब्दशः लागेल असा मारतात हो.. फ़ार serious नसेल तर कधी सहज ट्राय मारतात..लेक्चर बंक मारतात. एकमेकांवर जोक मारतात. इतरत्र संधी साधतात पण इथं chance मारतात. येवढचं नाही तर टपरीवर कटिंग मारतात. दिवसभर एवढी मारामारी केल्यावर मग कंटाळुन संध्याकाळी सायकल नाहीतर गाडी मारत घरी जातात..
तुम्हाला जोक सांगायला, ऐकायला आवडतात का? तर मग कोल्हापुरकर ग्रुप तुमच्यासाठी योग्य प्लॅटफ़ॉर्म आहे. इथं कोणताही PJ चालतो.. कितीही जुना, पांचट, अर्थहीन.. द्वापारयुगात सांदिपनी रुषींनी आश्रमात कधीतरी पोरांना सांगितलेला आणि त्यानंतर वर्षानुवर्षे मुखोद्गत होऊन चालत आलेला Antic PJ ऐकवुन तुम्ही गडागडा लोळेपर्यंत लोकांचा हशा घेवु शकता. ‘हसा आणि हसु द्या’ या तत्वानं जगणारी सात्विक लोकं आहेत ही. इथं शाहु महाराजांचा उल्लेख तुम्ही गल्लीत रहाणाऱ्या मित्राला बोलावता तसं एकेरी करु शकता. कारण इथं सगळेजणच स्वतःला शाहु महाराज समजत असतात.
कोल्हापुरकर जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी स्वतःची भाषा, बोलण्याची लकब, आवाजाचा चढऊतार (अम्म तसा चढच फ़क्त..) सोडत नाहीत.. पंचगंगेच्या पाण्यातच याचं गमक सापडेल बहुतेक.. अगदी अंटार्टिकाच्या बर्फ़ात नाहीतर अमेझॉनच्या खोऱ्यात सदाहरित जंगलात कुठेही तुम्हाला भावा sss SSS अशी आरोळी ऐकायला आली तर आपलाच कोणीतरी कोल्हापुरचा स्नेहबंधु जवळपास आहे हे ओळखावे. इतका बंधुभाव जपणारी माणसं जगात इतर कुठं सापडतील असं मला तरी वाटत नाही. ज्युनिअर पासुन सिनीयरपर्यंत, कंड्क्टरपासुन शिपायापर्यंत कुणालाही हे लोक भाऊ करुन टाकतात. उद्यापरवा कोल्हापुरच्या एखाद्या मुलीनेही तुम्हाला भावा म्हणुन हाक मारली तर फ़ार मनाला वैगेरे लागुन घेवु नका. भावा हे मित्रा सारखं ग्रुहीत धरुन चला.
काही मोजके अपवाद वगळता राग म्हणून काय असतं ते कोल्हापुरकरांच्या जवळपासही फ़िरकत नाही. मी तर म्हणेन राग यांना यायच्याआधी दहा अंक मनात मोजत असेल.. आणि स्वतःच शांत होऊन निघुन जात असेल. म्हणजे कोणी यांना शिवी जरी दिली तर "कसलं यमक जुळवलंय भावा.. जिकलस की" म्हणुन पाठीवर थाप देतील.
मला वाटतं..कोल्हापुर म्हणजे महाराष्ट्राचं पंजाब आहे. दिलखुलासपणा हा यांच्या अंगात भिनला आहे. विचार करुन बोलनं वैगेरे यांना जमतच नाही. तसलं ते पुणेरी वारं कोल्हापुरात येता येता वाटेतच कोरडं झालं.. कोल्हापुर पर्जन्यछायेच्या प्रदेशात आल्याने इथं या बाबतीत दुष्काळच आहे. मनात येईल ते हे लोक तोंडावर बोलुन जातात. म्हणजे एखादा राजकारणी विरोधी पार्टी च्या सभेत "तुमचा पुढच्या निवडणुकीत असा काटा काढणार आहे" असं म्हणुन ठरलेले internal party मनसुबे रागारागाने सांगुन गेला तरी फ़ारसं नवल नसावं..
कोल्हापुरकरांची काही स्फ़ुर्तिस्थाने आहेत. यांचा कायम उल्लेख तुम्हाला बोलण्यात कायम आढळेल. रंकाळा, शिवाजी पेठ, राजाभाऊ भेळ, फ़डतरे मिसळ, पाटाकडची तालिम.. आणि बरंच काही.. या कोणत्याही विषयावर हे लोक तासनतास बोलु शकतात.
पण यातही एक अस्सल टिपिकल कोल्हापुरी जागा आहे. शिवाजी पेठ. इथले लोक खरे native कोल्हापुरी आहेत. तुमच्या ग्रुप मध्ये या किंवा जवळपासच्या परिसरातले कोणी असतील तर तुम्हाला खरा कोल्हापुरी ठसका कळेल. इथला प्रत्येकजण कुठल्याना कुठल्यातरी मंडळात असतो.. मंडळाच नाव पण काय तर.. मैं हु ना ग्रुप.. नाद करायचा नाय गणेश मंडळ.. पाटाकडची तालीम मंडळ.. यांची ब्रिदवाक्यं पण तशीच अर्थपुर्ण.. "खटक्यावर बोट जाग्यावर पलटी" "आमच्याशिवाय हायेच कोण?" "घास आहे का कुणाचा?".. प्रत्येकजण आपल्या मंडळाचा committed उत्साही fulltime कार्यकर्ता असतो.. आणि या हातावर मोजता येण्याएवढी सदस्यसंख्या असणाऱ्या मंडळाची किर्ती तो मनमुराद पसरवत असतो..
प्रत्येक मंडळ एखाद्या तालिमीशी संलग्न असतं.. कोल्हापुरी लोक या मंडळांच्या कथा वर्षानुवर्षे सांगत असतात. कारण त्या प्रत्येक तालिमीमागे तसाच मोठ्ठा पिढ्यानपिढ्यांचा इतिहास असतो. या तालिमीही अशा की इथं दंड, बैठका, कुस्त्ती याबरोबरच कॅरम, पत्ते असल्या खेळांचही प्रशिक्षण दिलं जातं. हे सगळं सांगणाऱ्या मित्राची तब्येत बघुन कधीही विश्वास बसणार नाही की हा कधी तालिमीत सोडा.. तालिमीसमोरुनही गेला असेल..
मागच्या गणपतीच्या वेळी झालेल्या भांडणात आमच्या ग्रुप चे ५ लोक पोलिसांनी कसे पकडुन नेले. आणि नको तिथं चार काठ्या मारुन पुन्हा सोडुन कसे दिले. ही गोष्ट अगदी अभिमानाने छाती फ़ुगवुन सांगतात. अशा अनेक भांड्ण आणि मारामाऱ्या यांच्या कथा तुम्हाला चविने आणि दर वेळी दाद देवुन ऐकायला लागतील. या मंडळांच्या विसर्जणाच्या मिरवणुकाही तशाच.. डॉल्बींच्या भिंती काय.. लायटींग काय.. बेभान नाचनारी पोरं काय... मला तर कधीकधी वाटतं असल्या वातावरणात ट्रॅक्टरमध्ये अवघडुन बसलेला गणपतीच कधी तरी सगळं झुगारुन "काला कौआ काट खायेगा" च्या तालावर नाचायला लागतो कि काय…
हे लोक आपल्या घरी किती जुनी तलवार आहे असल्या गोष्टी ऐकवतात. मला आजपर्यंत कळलेलं नाही असल्या बिनकामी गोष्टी घरात धुळ खात ठेवुन हे लोक करतात काय? आहेतच तर त्याचा काहीतरी वापर तरी करावा. लोणच्यासाठी कैऱ्या कापायला जरी त्याचा उपयोग होत असला तरी माझी हरकत नाही.. असो..
का तुम्हाला सातारकर ग्रुप मध्ये जायचं आहे? तर मग तुम्हाला ज्या विषयावर बोलायचं आहे त्याचा पुरता अभ्यास करुन जावं लागेल. कारण उत्तरेहुन पुण्याकडून येणारे उष्ण सांस्क्रुतिक ’शिष्टा’चाराचा प्रवाह आणि दक्षिणेतुन कोल्हापुरकडुन येणारा थंड रांगडा प्रवाह एकत्र येऊन काहीतरी मस्त उबदार तात्विक वातावरण इथं तयार झालं आहे असं माझं एक भौगोलिक cum सामाजिक निरिक्षण आहे. याच हवामानाच्या परिणामांमुळे लोक इथं रात्ररात्रं सभा टाकू शकतात. न थकता.. न कंटाळता.. सभांचे विषयदेखील गांगुलीला ओपनिंग द्यावी का नको इतकया हलक्याफ़ुलक्यापासुन अंधश्रद्धा विरुद्ध science इतके जड असु शकतात. प्रेम, धर्म, वास्तववाद, कला असल्या अगम्य विषयांवर तर यांचं प्रभुत्व आहे. इथं प्रत्येकजण स्वतःचा मुद्दा सांगायला आणि पटवायला टपलेला असतो. सगळ्यांचा हाच stance असल्याकारणाने कधी कधी नकळत वादविवादाचे कलहात रुपांतर होते.
सातारकरांचे साताऱ्यावर विलक्षण प्रेम आणि अभिमान आहे हे अधीच जाणुन घ्या. तसंच ते कोल्हापुरकरांनांही आहे. पण या दोन्हींत जमीन अस्मानाचा फ़रक आहे. तुम्ही कोल्हापुरकरांवर शाहु महाराज ते फ़डतरे मिसळ कशावरुनही जोक मारुन फ़ार फ़ार तर एका शिवीवर सुटू शकता.
किंवा कावलायस काय? डोक्यावर पडलयस काय? असलं काहीतरी म्हणतील. कारण त्रागा व्यक्त करण्याची त्यांची ती पद्धतच आहे. पण सातारकरांच तसं नाही. तुम्ही कर्मवीर भाऊराव पाटलांचा उल्लेख "ते रयतवाले कोण रे पाटील कोणीतरी" असा ‘कर्मवीर’शिवाय एकेरी केला म्हणून तुमच्या चांगल्या मैत्रीला तडे जाण्याइतपत मतभेद करुन घ्याल.
सातारकरांच मत सह्याद्रिचं सौंदर्य साताऱ्यात सुरु होऊन तिथंच कुठेतरी संपतं असं आहे. महाबळेश्वर, सज्जनगड, चाळकेवाडी.. शेकडो गोष्टींवर हे लोक गप्पा मारतील. ठोसेघरच्या धबधब्याची वर्णनं ऐकवुन तर भर उन्हाळ्यात तुमच्या अंगावर शहारे आणतील.
तुम्हाला एखादी आधी यमक, मग शब्द आणि मग कुठेतरी शेवटी आशय अशा आडमार्गाने सुचलेली मोडकीतोडकी कविता ऐकवायची असेल. किंवा एखादी ड्रॉईंग शीट सरांनी rework शेरा मारुन परत दिली म्हणुन त्याच शीटच्या मागे त्याच सरांचं काढलेलं कार्टून दाखवायचं असेल. सांगलीकरांकडे जाण्याची चूक करु नका. कारण हे लोक जन्माने समीक्षक आहेत. याच critic gene च्या प्रभावामुळे हे लोक तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल असल्या सुधारणा आणि टीका ऐकवतील. कोल्हापुरकरांकडे गेलात तर कौतुक करुन क्षणभर तुम्हाला शेक्स्पीयर, लिओनार्दो दा व्हिंची, मायकल ऐंजेलो पासुन ते कुसुमाग्रज, पाडगावकर अशा प्रतिभावंतांमधून स्वप्नसफ़र घडवुन आणतील. त्यापेक्षा सातारकरांकडे आपला कलाविष्कार सादर करा आणि यथासांग विवेचन ऐकुन घ्या. पंधरा एक मिनीटाच्या आपल्या creative आविष्कारावर हे लोक तासतासभर भरभरुन बोलत आहेत याचंच तुम्हाला समाधान मिळुन जाईल.
तुम्हाला एखादी मुलगी आवडली आहे कॉलेजमध्ये? तुम्हाला तुमची प्रेमकथा कुणालाही ऐकवावीशी वाटली तरी सांगलीकरांच्या वाटेला चुकुनही जाउ नका. तुम्ही आपलं तुमच्या मनातलीविषयी मनापासुन काहीतरी सांगायला जाल आणि "कोण? ती? ती जरा तिरळी बघते का रे? " "मला तर मंद वाटते ती" असलं काहीतरी परखड मतप्रदर्शन करुन तो तुमच्या प्रेमाचा फ़ुगा फ़ुगायच्या आधीच पंक्चर करेल.
असली गोष्ट कोल्हापुरकरांना सांगा.. हे लोक तुम्हाला फ़ुल्ल जिकवतील. अजुन कशात काही नसताना वरातीच्या घोडीवर नेऊन बसवतील. Confidence वैगेरे काही हवं असेल तर इथुन भरभरुन मिळेल. सरळ रस्त्यावरुन जात असताना तुम्हाला हे लोक प्रपोजच्या दारात नेऊन ठेवतील. प्रसंगी मागुन धक्काही देतील. पण यापेक्षा सगळ्यात चांगला सल्ला देतो. सातारकरांना सांगा. या विषयावर authority असलेले हे लोक तुमचं ऐकुन घेतील. त्यांचे अनुभव सांगतील.या वैचारिक आदानप्रदानात मस्त गप्पा रंगतील. काही नाही झालंच तरी फ़ुगा तरी तुर्तास शाबुत राहील..
या लोकांविषयी मी तासनतास बोलत राहु शकतो.. कारण सगळे आहेतच तसे.. मला हे सगळेजण त्या त्या वेळी तसे तसे भेटले हे मला मिळालेलं गिफ़्ट आहे. मला या सगळ्यांतले बरेचसे चेहरे जसेच्या तसे आठवतात. यांच्या जमवलेल्या बऱ्याचशा चांगल्या वाईट आठवणी आहेत माझ्याकडे.. लिहित राहिलो तर हनुमानच्या शेपटीसारख्या वाढतच राहतील. तेव्हा कोणी आग लावायच्या आधी मी स्वतःहुन आवरतं घेतो.
कोणीतरी विचारेल.. तु यापैकी कोणत्या ग्रुप मध्ये होतास?..किंवा तुला यातला कोणता ग्रुप आवडतो?.. मी फ़ार फ़ार तर हसुन सांगेन..
कसं असतं तुम्ही जर सच्चे खवय्ये असाल तर मग भडंग काय, तांबडा पांढरा रस्सा काय किंवा कंदी पेढे काय सगळ्या चवी तशाच जीभेवर रेंगाळत राहतात.. वेगवेगळ्या.. वैशिष्ट्यपुर्ण.. पण तशाच हव्याहव्याशा..
अमित पवार.. amitpawar21@gmail.com
Friday, September 19, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
24 comments:
hi amit.tu mala olkhat nasahil :) ....pan asa thodach aahe ki tuza lihilele column vachnyasathi olakh havi ..:)..nyways tula sangu icchito ki....me ha lekh manapasun njoy kela karan tasach kahisa mazahi anubhav .....khas karung sanglikaran baddal sangitlel dicto match zal..khooopach chaan...1 number ahe...
Amit , Ekdam bhari lihil aahes. Sanglikarana kolhapur karana ani satarakarana sagalyana aavadel as..
ekadam barik barik goshti chan tipalya aahes. Halli pu. l. chya style n lihayala lagala aahes. Ekadam bhari. Jabardast. Aapalya grp la ek changala lekhak milala.
hi, amit....
"Sanglikar....." is too good yaar.... sahi aahe bhaava...
simply brilliant
Ziklas bhava
one of my friends forwarded this ... and following were my reactions ...
"कोल्हापूर म्हणजे महाराष्ट्राचं पंजाब आहे" ROTFL ... aai shappath!!! ang bharun maar pahije bhavala!!!
"ती मंद वाटते मला" "ती तिरळी बघते काय?" LOL awesome catch!
असो ... मस्त लिहिलायस ... कुठली बॅच वालचंदची?
Ekdum zakkas! full to fida...
Bhannat lihitos ki.......avadala aplyali tuzi "Pratibha" ( lihinyatali) Amit...........Konati batch Walchandchi te jara sangunach tak ki..........
Layeee bhari!
Bhawa sssssssssssss lai bes
bhandu ekdam "khatakyawar bot jagyawar palti" likhan kel aahes tu , tuza "nad bad" wichar far awadale. thodkyat "jhikalyassssss, jira rice, fried rise, dal rise" mhanayla kay harkat nahi. kolhapuri paragraph madhe thodi shiwyanchi uniw bhasali pan ekandarit "nad khula".
Thik Jamlay...Ajun changla Hou shakla asta !!
Sanglikaranbaddalcha lekh aani "Gaavbhag" ekda sudha nahi aala...Ccchhh :)
~Ek Mirajkar Samikshak
kasal jikalay ;D
नमस्कार, आपला हा लेख इथे चोरला गेला आहे. मी २ वेळा तिथे कमेंट टाकली पण त्या ब्लॉगमालकाने ती प्रकाशित केली नाही.
http://arunoday2010.blogspot.com/2010/04/blog-post_17.html
ही माझी तेथील प्रतिक्रिया.
"मी पहिल्या भागावर सुद्धा प्रतिक्रिया दिली होती. पण आपण माझी प्रतिक्रिया छापून आणली नाहीत. मूळ लेखक अज्ञात नाही. मूळ लेख इथे आहे. पण तुम्ही जाणूनबुजून मूळ लेखकाचं नाव देत नाही आहात. ही सरळ सरळ चोरी आहे. मूळ लेख
http://amitpawar21.blogspot.com/2008/09/blog-post_19.html
अर्थात तुम्ही ही प्रतिक्रिया पण छापून आणणार नाही याची मला खात्री आहे.. तरीही.... !!!"
तुम्ही स्वतःच त्या चोराशी संपर्क करून तुम्हाला श्रेय देण्यास भाग पाडा.. आभार..
Kasle bharriiii lihita ho tumhi...!!!
Mastach...!!! :)
faar chhan lihalay
मला हा लेख ईमेल फोर्वर्ड मधे आला होता. त्यावेळी तो कोणाचा हे माहित नव्हत, परवाच्या हेरंबच्या लेखातून हे समजलं. मस्त मस्त मस्त मस्त .. लेख आवडला !
दोनेक वर्षापूर्वी तुन्ही हा लेख पोस्ट केलाय..व आम्ही आज पोचलो तुमच्यापर्यंत...असो...
तुमच्या निरिक्षण शक्तीला साष्टांग नमस्कार!
दोनेक वर्षापूर्वी तुन्ही हा लेख पोस्ट केलाय..व आम्ही आज पोचलो तुमच्यापर्यंत...असो...
तुमच्या निरिक्षण शक्तीला साष्टांग नमस्कार!
Chan hota lekh.. Pu La cha lekh vachun jevadha hasalo .. jawalpaas tevadhach atta hi hasu aala.. thanks!
Khup sundar.."kolhapur he maharashtracha panjab" he khup apeal zala. Sangalitli maramari tar farach aawadli. Keep it up.
hehe ! Nice observation and well documented!
Post a Comment